नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवं शैक्षणिक धोरण ही आत्मनिर्भर भारताचा पाया आहे असं शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यानी म्हटलं आहे. काल लोकसभेत शिक्षण मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना बोलत होते. विकसीत देशांत मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं असं त्यांनी सांगितलं. हेच बाब लक्षात घेऊन नव्या शैक्षणिक धोरणात 22 भारती भाषांमधून शिक्षणावर भर दिला आहे. शालेय अभ्यासक्रमात आरटीफिशियल इंटेलिजन्स – कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे.

येत्या पाच वर्षात देशातील संशोधन क्षेत्राला उभारी देण्यासाठी राष्ट्रीय संशोधन संस्थेला 50 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं निशंक यांनी सांगितलं. भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये मुलींसाठीच्या राखीव जागांमध्ये 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. कोविड संकटाच्या काळातही ऑनलाईन वर्ग, शाळांत परीक्षा जे ई ई आणि नीट सारख्या महत्वाच्या प्रवेश परिक्षाही सरकारनं यशस्वीरीत्या पार पाडल्या असं ते म्हणाले.

नवं शैक्षणिक धोरण क्रांतीकारी असून शिक्षणसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतूदीमध्ये अनेक पटीनं वाढ झाली आहे असं खासदार संजय जयस्वाल या चर्चेदरम्यान म्हणाले. पंतप्रधान ई-विद्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध भाषांमधील अभ्यास साहित्य मिळणं सुलभ झालं असून 1 कोटी विद्यार्थ्यानी या ऑनलाईन प्लाटफॉर्म ला भेट दिली अशी माहिती खासदार तेजस्वी सूर्या यांनी दिली.