मुंबई : राज्यातील माजी सैनिक आणि लष्करात कार्यरत असणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्यासाठी प्राधान्य द्यावे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

मंत्रालयात माजी सैनिक कल्याण विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री.भुसे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह उपस्थित होत्या.

श्री.भुसे म्हणाले, माजी सैनिक, लष्करातील जवानांच्या शौर्याप्रती, बलिदानाप्रती आदर व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक त्या सोयी पुरविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. माजी सैनिक किंवा प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या जवानांच्या कुटुंबियांना घर देण्याचा मानस श्री.भुसे यांनी यावेळी व्यक्त केला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात बसणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना घर देण्याबाबत प्राधान्य देण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

राज्यातील आजी-माजी सैनिकांच्या घरांना घरपट्टीतून सूट द्यावी यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असून वित्त विभागाकडे या संदर्भात प्रस्ताव पाठवावा. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्र्यांशी या प्रकरणी चर्चा करु, असे श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले. सैनिकाची पत्नी शासकीय सेवेत असेल तर त्यांना घराजवळ किंवा इच्छित ठिकाणी बदली देण्याचे धोरण तयार करावे, अशी सूचनादेखील मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केली.