मुंबई : राज्यातील तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश असलेले तृतीयपंथीय कल्याण मंडळ शासन निर्णय होऊनही प्रलंबित आहे. हे मंडळ तात्काळ अस्तित्वात आणण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तृतीयपंथीयांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री.पवार बोलत होते.

श्री.पवार म्हणाले, तृतीयपंथीय समाज घटकांची सर्वांगीण उन्नती व्हावी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले जावे, तसेच या समाजघटकांच्या समस्या बहुतांश विभिन्न स्वरुपाच्या असल्यामुळे शासनाचे विविध विभाग व या क्षेत्रातील कार्यरत तज्ज्ञ व्यक्तींचे मिळून त्यांच्या विकासाकरिता तृतीयपंथीय कल्याण मंडळ रुपाने स्वतंत्र कल्याणकारी उपाययोजनात्मक यंत्रणा निर्माण केली जाईल. या मंडळामार्फत तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचा आर्थिक व सांस्कृतिक विकास घडवून आणला जाईल.

तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी या मंडळामार्फत मराठी भाषेत हेल्पलाईन सुरु करण्यात येईल. त्यांचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास करण्यासाठी या कल्याण मंडळामार्फत प्रयत्न केले जाणार असल्याचेही श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे, तृतीयपंथीय शिष्टमंडळाच्या गौरी सावंत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितिन गद्रे, दिव्यांग कल्याण आयुक्त श्रीमती प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.