मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात दोन दिवस नव्या रुग्णांच्या संख्येत दिलासादायक घट आढळल्यानंतर काल पुन्हा त्यात वाढ झाली. काल ३९ हजार ५४४ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, २३ हजार ६०० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आतापर्यंत एकूण  २८ लाख १२ हजार ९८० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत २४ लाख ७२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ८५ पूर्णांक ३४ शतांश  झाला आहे. राज्यात सध्या ३ लाख ५६ हजार २४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात काल २२७ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातला मृत्यूदर १ पूर्णांक ९४ शतांश टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासलेल्या १ कोटी ९७ लाख ९२ हजार १४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४ पूर्णांक २१ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.