मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा ज्योतिबा फुले य़ांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देश त्यांना आदरांजली वाहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि इतर मान्यवरांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली.

महात्मा फुले हे थोर विचारवंत, तत्वज्ञ, मानववंश शास्त्रज्ञ आणि लेखक होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य महिलांच्या शिक्षण आणि सक्षमिकरणासाठी वाहून घेतलं होतं. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत, त्यांची बांधिलकी आणि समर्पण येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरणा देत राहिलं, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. महात्मा फुले यांचे विचार, कार्यकर्तृत्व आजच्या परिस्थितीतही मार्गदर्शक आहेत. त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही मूल्यं रुजवण्यासाठी आय़ुष्य वेचलं.

अनिष्ट रुढी-प्रथामुक्त आणि शोषणमुक्त समाजाचा आग्रह धरला. स्त्री-शिक्षणासह विविध सामाजिक सुधारणांसाठी क्रांतीकारी पावलं उचलतानाच महात्मा फुले यांनी शेती-सिंचन, औद्योगीक आणि पायाभूत विकास क्षेत्रातही कृतीशील योगदानाचा आदर्श उभा केला. त्यांच्या या मार्गदर्शनानुसार वाटचाल करण्यासाठी आपणही वचनबद्ध होऊया. असं मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महात्मा फुले यांना अभिवादन केलं आहे. महात्मा ज्योतीबा फुले हे खऱ्या अर्थानं क्रांतीसूर्य होते. त्यांच्या प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी, सत्यशोधक विचारांवर आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे.

” अशा शब्दात त्यांनी आदरांजली वाहिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही महात्मा फुले यांनी आदरांजली वाहिली आहे. मुलींची पहिली शाळा काढून देशात  महिलां शिक्षणाचा  पाया महात्मा फुले यांनी रचला.

त्याचबरोबर भारतीय समाजातल्या जातीवर आधारित भेदभावाचा नायनाट करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय  योगदान दिलं, असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.