मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आणि राज्य पुरस्कृत सर्व आवास योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी आणि त्यात गुणवत्ता आणण्यासाठी राबवल्या जात असलेल्या ग्रामीण महाआवास अभियानाला, राज्य शासनानं येत्या ५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या पात्र लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेश करता यावा, तसंच घरकुलासोबतच शासनाच्या इतर योजनांचा लाभ देऊन त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले.

राष्ट्रीय आवास दिन २० नोव्हेंबर २०२० पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरु झालेल्या या अभियानाची वाटचाल यशस्वीरित्या सुरू आहे. या कालावधीत सुमारे ७ लाख ५० हजार घरकुलांची बांधकामं हाती घेतली.

त्यापैकी आतापर्यंत ३ लाख ५० हजार घरकुलं पूर्ण झाली असून ३ लाख ९९ हजार घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. उर्वरित घरकुलांचं काम गुणवत्तापूर्ण आणि जलदगतीनं पूर्ण करण्याच्या सूचना सर्व जिल्हा परिषदांना दिल्या आहेत, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.