मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत काल ९०७ रुग्णांची वाढ झाली तर ५१ बाधितांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे जिल्ह्यातली रुग्ण संख्या आता ५ लाख ९ हजार ७६७ वर पोहचली आहे. तर मृतांची संख्या ८ हजार ८७१ झाली आहे. जिल्हयात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून गेल्या २४ तासांमध्ये २ हजार ३०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतार्पंयत ४ लाख १३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ठाणे शहरात रविवारी १९९ रुग्ण आढळले. त्यापाठोपाठ कल्याण डोंबिवलीमध्ये २१०, उल्हासनगर आणि भिवंडीत प्रत्येकी २२ तर मीरा भाईंदरमध्ये १३४ रुग्णांची नव्यानं वाढ झाली आहे.

अंबरनाथमध्ये १८ आणि बदलापूर परिसरात ३६ कोरोना बाधीत आढळलं असून या भागात सुदैवानं एकाचाही मृत्यु झालेला नसल्यामुळं समाधान व्यक्त होत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या १९ हजार २६ गावांपैकी ८८९ गावे पूर्णतः कोरोना मुक्त झाली आहेत यात पेठ तालुक्यातील सर्वाधिक ११७ आणि त्या खालोखाल सुरगाणा तालुक्यात ११३, त्र्यंबक तालुक्यात ९६, इगतपुरी तालुक्यात ९२, बागलाण ८१, कळवण ७१, दिंडोरीमधील ५८ गावांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात विशेषतः आदिवासी भागात कोरोना मुक्त होणाऱ्या गावांची संख्या अधिक आहे.चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८३८ जणांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर ३५५ कोरोना बाधीत रुग्णांची नव्यानं भर पडली असून १२ बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८० हजार ९५५ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७३ हजार ८३६ झाली आहे. सध्या ५ हजार ७५१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ५५ हजार ४८८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३ लाख ७२ हजार १२ नमुने निगेटीव्ह आले आहेत.