मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लागू केलेले निर्बंध १५ जूनपर्यंत कायम राहणार आहेत. मात्र रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेनुसार जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करत असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर १० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यापेक्षा कमी भरले असतील तर तिथे सर्व आवश्यक वस्तू आणि सेवांची दुकानं सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील. आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांबाबत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल.

आवश्यक गटातल्या दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील, तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील. अशा भागांत आवश्यक वस्तूंबरोबरच आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील. दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील. कृषिविषयक दुकाने दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील.

येणारा पावसाळा आणि पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकतात किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवायला परवानगी देऊ शकतं. ज्या पालिका किंवा जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हीटी दर २० टक्क्यापेक्षा जास्त असेल, आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील, तिथं निर्बंध वाढवले आहेत. अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद राहतील.

कुणालाही जिल्ह्याच्या आत बाहेर करायला परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातला मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल. या सर्वांसाठी २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटची आकडेवारी गृहीत धरली जाईल. १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक समजल्या जातील. तर या पालिका क्षेत्रांव्यतिरिक्त जिल्ह्यातला उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील. याव्यतिरिक्त इतर सर्व जिल्हे आणि पालिकांच्या ठिकाणी ब्रेक दि चेनचे निर्बंध आधीप्रमाणे लागू राहतील.