नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या आषाढी यात्रेदरम्यानही विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंदच राहणार आहे. मात्र १२ जुलै पासून भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन ऑनलाईन पध्दतीने २४ तास घेता येणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची  बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे पंढरपूर येथील भक्त निवास मध्ये संपन्न झाली. यानंतर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मानाचे वारकरी, दिडेंकरी आणि मानाचे महाराज असे १९५ मंडळींना देवाचे दर्शन देण्याचे ठरवण्यात आले आहे. पंढरपुरातील फडकरी व येणाऱ्या दिंड्यांना नगरप्रदक्षिणा करण्यासाठी आणि पांडुरंगाच्या रथालासुद्धा विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मानाचे नैवद्य आहेत, त्या सर्वांना देवाला मानाचा नैवेद्य दाखवण्याची परवानगी देण्यात आली आहे.  ज्यांच्या पादुका आणि पालखी भेटी ठरेलेल्या आहेत, त्या भेटी घडवण्यात येणार आहे, असेही औसेकर यांनी सांगितले.

२० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्र्यांना या महापूजेसाठी निमंत्रण देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.