मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या १० वी इयत्तेचे निकाल येत्या १५ जुलैला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयांमधे प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा पूर्णत: ऐच्छिक असून, राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. १०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ स्वरुपाचे १०० प्रश्न परीक्षेत असतील.

राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळं शुल्क भरावं लागणार नाही. इतर शिक्षण मंडळातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा शुल्क आकारलं जाईल. इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबवताना, विद्यार्थ्यांना सीईटी मधल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्राधान्य देण्यात येईल.

सीईटी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना, दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल, असं मंडळानं सांगितलं आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. राज्यातल्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधे पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.