नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव असतानाही भारतानं या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विक्रमी निर्यात केली आहे. तसंच, गेल्या आर्थिक वर्षातही ८१ अब्ज ७२ कोटी डॉलरची आतापर्यंतची सर्वोच्च थेट परकी गुंतवणूक मिळवली आहे, अशी माहिती व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भारतानं एप्रिल ते जून या कालावधीत ९५ अब्ज डॉलरची निर्यात केली. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत ९० अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. अभियांत्रिकी साहित्य आणि तांदळाची निर्यात वाढली असल्याचं गोयल यांनी सांगितलं.चालू आर्थिक वर्षात ४०० अब्ज डॉलरची निर्यात करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं.