नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुक्त गावांमधे येत्या १५ तारखेपासून इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करायची तयारी राज्य शासनानं केली आहे. शेवटच्या घटकातल्या मुलांपर्यंत शिक्षण पोचवण्यासाठी मिश्रित शिक्षणाचा दृष्टिकोन बाळगणं ही काळाची गरज बनली आहे.

ही बाब लक्षात घेऊन दूरस्थ शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाला चालना देण्यासोबतच कोरोनामुक्त ग्रामीण भागांत कोरोना प्रतिबंधाची संपूर्ण खबरदारी घेऊन शाळा सुरु करत असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

ज्या गावांमध्ये गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसेल, तसंच भविष्यात ही गावं कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीनं सर्वानुमते केला असेल, अशा गावांत इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरु करायला मंजुरी दिली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

शाळा सुरु करण्यापूर्वी, राज्य शासनानं घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करणं हे सर्वांसाठी बंधनकारक आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.

गाव पातळीवर कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं, यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखालची समिती जबाबदार असेल. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे गावातल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आणि अंमलबजावणीचा वेळोवेळी आढावा घेतील.

शाळा सुरु होण्यापूर्वी संबंधित शाळांतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण प्राधान्यक्रमानं करून घ्यावं, असंही त्यांनी म्हटलंय.