मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बुधवारी ७ हजार ४३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ६ हजार १२६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १९५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख २७ हजार १९४ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ६१ लाख १७ हजार ५६० रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३३ हजार ४१० रुग्ण दगावले.

सध्या राज्यात ७२ हजार ८१० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ६९ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १ दशांश टक्के आहे.

सांगली जिल्ह्यात काल ८५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल जिल्ह्यात ६२८ नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या जिल्ह्यात सहा हजार ८६९ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काल या आजारामुळे २५ रुग्ण दगावले.

परभणी जिल्ह्यात १ रुग्ण बरा होऊन घरी गेला. सध्या जिल्ह्यात २४ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

जळगाव जिल्ह्यात काल बरे झालेल्या ६ रुग्णांना घरी पाठवलं. काल जिल्ह्यात ४ नवीन रुग्ण आढळले. सध्या ६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाशिम जिल्ह्यात काल ३ रूग्णांनी कोरोनावर मात केली. काल जिल्ह्यात २ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आला. सध्या जिल्ह्यात २८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

नांदेड जिल्ह्यात काल ८ रुग्ण या आजारातून मुक्त झाले. काल जिल्ह्यात ६ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले. सध्या ४३ रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईत काल ४३८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, ३६३ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आत्तापर्यंत मुंबईतल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७ लाख ३६ हजार २२ झाली आहे.

यापैकी ७ लाख १३ हजार १६१ रुग्ण बरे झाले आहेत, तर १५ हजार ९२० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईभरात ४ हजार ५३० कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतला कोरोना मुक्तीदर ९७ टक्क्यावर स्थिर आहे, तर रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून १ हजार ५९५ दिवसांवर पोचला आहे.