मुंबई (वृत्तसंस्था) : सीमाभागातल्या नागरिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्यानं अन्याय होत असून तो थांबवून हा भाग महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह सीमाभागातील मराठी भाषकांचे संयुक्त महाराष्ट्र राज्य असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असून सीमाभागातल्या मराठी बांधवांना आपण न्याय द्यावा अशी मागणीही त्यांनी प्रधानमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आपण सीमाभागातल्या नागरिकांच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्याचंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.