घोरपडी रेल्वे उड्डाणपूलाचे भूमिपूजन

पुणे : राष्ट्रीय, राज्य, जिल्हा तसेच ग्रामीण रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून दळणवळणाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगतानाच राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री, महसुलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

घोरपडी रेल्वे उड्डाणपूलाचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  महापौर मुक्ता टिळक, खा. गिरीष बापट, आ. दिलीप कांबळे, आ. योगेश टिळेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे, माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यात रस्ते विकासाला गती देण्यात आली असून राष्ट्रीय महामार्ग 17 हजार किलोमीटरने वाढविण्यात आले आहेत. राज्यात 10 हजार किलोमीटर तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 30 हजार किलोमीटर रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगतानाच मुंबई, पुणे व नागपूर येथील मेट्रो प्रकल्पाची कामे गतीने पुर्ण करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात एकूण 265 रेल्वे फाटक असून तीन वर्षापुर्वीच या रेल्वेफाटकावर उड्डाणपूल व्हावे, यासंदर्भात निर्णय घेत 170 उड्डाणपूलांची कामेही पुर्णत्वास आली आहेत, उर्वरित उड्डाणपूलांची कामेही दोन वर्षात पुर्ण करण्यात येतील, असे सांगून पालकमंत्री पाटील यांनी राज्य शासनाच्या योजनांचा सामान्य नागरिकांना मोठया प्रमाणात लाभ होत असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक करताना महापौर मुक्ता टिळक यांनी घोरपडी उड्डाणपूलाचे काम 36 महिन्यात पुर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.

यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, आ. योगेश टिळेकर यांचीही भाषणे झाली.  यावेळी  नागरिक, महिला व युवक मोठया संख्येने उपस्थित होते.