नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्वच खेळाडूंनी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत देशाच्या विविध भागातल्या ७५ शाळांमध्ये भेटी देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आणि कुपोषणाबाबत विद्यार्थीवर्गामध्ये जागृती निर्माण करत त्यांना खेळण्यासाठी प्रवृत्त करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ऑलंपिक पदक विजेत्या भारतीय खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांनी आज संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच खेळाडुंची कामगिरी देशाला गौरवास्पद वाटावी अशी आहे, असंही मोदी म्हणाले. यश मिळालं नाही म्हणून निराश व्हायची गरज नाही. मिळालेला विजय किंवा यश डोक्यात जाऊ देऊ नका आणि अपयश कधी मनात बाळगत बसू नका, असा वडिलकिचा सल्लाही प्रधानमंत्र्यांनी सर्व खेळा़डुंना दिला. ऑलिम्पिक्समध्ये हार पत्करावी लागल्यानंतरही प्रधानमंत्र्यांनी दूरध्वनी करून संघाचं मनोधैर्य वाढविल्याबद्दल महिला हॉकी संघानं मोदी यांचे आभार मानले.