मुंबई (वृत्तसंस्था) :पैठणमधल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा सर्वंकष विकास करताना या परिसरात पर्यटकांची संख्या वाढावण्यासाठी या उद्यान परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण कराव्यात, त्यादृष्टीनं सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत ‘वर्षा’ निवासस्थानी यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते.

पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाची दुरवस्था झाल्यानं त्याचं नूतनीकरण करून हे उद्यान विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. हे उद्यान विकसित करताना जनतेच्या आशा,अपेक्षा जाणून घेण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या होत्या.

त्याशिवाय स्पर्धात्मक पद्धतीनं महाविद्यालयीन विद्यार्थी आणि जनतेकडून उद्यान विकासाचे आराखडे मागवले होते. औरंगाबादच्या एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आराखड्याचं, तसंच वास्तुविशारद पी. के. दास यांनी तयार केलेल्या आराखड्याचं या बैठकीत सादरीकरण करण्यात आलं.