मुंबई (वृत्तसंस्था) :जीएम सोयाकेकच्या आयातीचा निर्णय केंद्र सरकारने तात्काळ रद्द करावा, अशी मागणी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पाठवले आहे.

देशात आणि राज्यातही सोयाबीनचं मोठे क्षेत्र आहे. महाराष्ट्र हे सोयाबीनचे उत्पादन घेणारे देशातलं सर्वात मोठे राज्य असून ४५ लक्ष हेक्टरवर उत्पादन होते. गेल्या वर्षी सोयाबीनला चांगले दर मिळाल्याने सोयाबीनचे क्षेत्र राज्यात वाढले आहे.

यावर्षी सोयाबीनचे चांगले उत्पादन होईल असा अंदाज असतानाच केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागांतर्गतच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने १२ लाख टन जनुकीय बदल केलेल्या जीएम-सोयाकेक आयातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

बाजारात नवीन सोयाबीन येण्यास सुरूवात झाली असतानाच हा आयातीचा निर्णय झाला, त्यानंतर लगेच सोयाबीनचे भाव सुमारे दोन हजार रुपयांनी खाली आल्याचे सांगत, भुसे यांनी या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

एकीकडे जनुकीय बदल केलेल्या सोयाबीनच्या उत्पादनाला केंद्र सरकारने देशात अद्याप परवानगी दिलेली नाही, मात्र प्रदेशातल्या जीएम सोयाकेकच्या आयातीला परवानगी दिली आहे, हा निर्णय अन्यायकारक असून त्याचा पुनर्विचार करून हा निर्णय तात्काळ रद्द करावा, असे भुसे यांनी केंद्रीय मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.