मुंबई : देशातील युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागवणे तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती गावागावांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने सुरु केलेली नेहरू युवा केंद्रे देशात तसेच राज्यात चांगले कार्य करीत असून कोरोना काळात राज्यातील नेहरू युवा केंद्रांनी अतिशय चांगले काम केले आहे. केंद्रांनी ग्रामीण तसेच आदिवासी भागांच्या उन्नतीसाठी कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

नेहरू युवा केंद्रांच्या महाराष्ट्र व गोवा शाखेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट संस्था / मंडळ पुरस्कार सोमवारी (दि.27) राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपालांच्या हस्ते गायन व संगीत क्षेत्रातील सेवेबद्दल गायिका सुनाली राठोड व गायक रुपकुमार राठोड यांना सन्मानित करण्यात आले. ग्रामीण तंत्रज्ञान संस्था, सुंदरबन, न्हावरे, ता. शिरूर, जिल्हा पुणे या संस्थेला युवा शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबन कार्यासाठी उत्कृष्ट संस्था पुरस्कार व १ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष गीताराम कदम यांनी पुरस्कार स्वीकारला.

कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य संचालक प्रकाश कुमार मनुरे, उपसंचालक यशवंत मानखेडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी डॉ.अरविन्द शाळीग्राम, मुख्य कार्यकारी अधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, काकासाहेब चंद्रकांत मोहिते, प्राचार्य, रसिका कुलकर्णी, शरद आनंदराव पाबळे, (पत्रकारिता), सुभाष दळवी, विशेष कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगरपालिका,  संदीप नवले, (पत्रकारिता), श्रद्धा दळवी, सामाजिक कार्यकर्ता, पृथ्वी बाळासाहेब इंगोले-राक्षे, सुज्ञान मानखेडकर, राज सुनिल रनधिर, आम्रपाली चव्हाण,  सागर हेमाडे, विकास कतरे यांचा सत्कार करण्यात आला.