मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे.त्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या २७ साखर कारखान्यांच्या विरुद्ध साखर आयुक्तालयानं आर.आर.सी. आदेश लागू केले आहेत. त्यापैकी सगळ्यात जास्त १३ कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. लातूरमध्ये ३, सांगली सातारा उस्मानाबाद बीड या ४ जिल्ह्यात प्रत्येकी २, तर नाशिक, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे. गेल्या गाळप हंगामात एफ.आर.पी. म्हणजेच रास्त आणि किफायतशीर ऊसदराची रक्कम संपूर्णपणे काही कारखान्यांनी ठरलेल्या कालावधीत दिली आहे. तर काही कारखान्यांनी कालावधी उलटूनही एफ.आर.पी.ची रक्कम अदा केलेली नाही.त्या संदर्भातल्या तक्रारी शासनाकडे आणि साखर आयुक्तालयाकडे आल्या.त्याप्रमाणे साखर कारखान्यांच्या विरुद्ध साखर आयुक्तालयाने आर.आर.सी. आदेश निर्गमित केले आहेत.