मुंबई (वृत्तसंस्था) : किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच ‘सखी प्रेरणा भवन‘ हा अभिनव प्रयोग राबवला जात आहे. मासिक पाळीसारख्या अतिशय नाजुक व अव्यक्त विषयावर महिलामध्ये खुलेपणाने चर्चा होणं ही काळाची गरज आहे. हीच चर्चा सखी प्रेरणा भवन माध्यमातून नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर सारख्या लहानश्या गावातून सुरु झाली आहे. सखी प्रेरणा भवन म्हणजे ग्रामीण पातळीवर महिलांसाठी तयार करण्यात आलेली एक प्रतिष्ठा खोली आहे. यात महिलांना सॅनिटरी पॅड सोबत त्यांच्याशी निगडीत समस्स्यांचं निराकरण देखील होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी आणि उपमुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांच्या हस्ते जिल्ह्यातल्या या पहिल्या सखी प्रेरणा भवनाचे उदघाटन झालं. श्रीरामपुर ग्रामपंचायत आणि फिनिश सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या सखी प्रेरणा भवनाची संकल्पना साकारली गेली आहे.