मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्राने राज्याच्या कामात हस्तक्षेप करू नये, असा स्पष्ट सल्ला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते काल मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. राज्य आणि केंद्राच्या अधिकाराबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले. “राज्याला सुद्धा केंद्राबरोबरीचे हक्क दिले आहेत. तीन गोष्टी ज्या आहेत, त्या आणि त्याच वेळेला केंद्र राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करु शकतो. तो म्हणजे एक आणीबाणीजन्य परिस्थितीत, दुसरं परकीय आक्रमण, आणि तिसरं विदेशाबरोबर संबंध कसे असावे, हे ठरवण्याचं धोरण केंद्र सरकार घेऊ शकतं, अन्यथा जर केंद्राने राज्याच्या कारभारात ढवळाढवळ केली, तर ते घटनाबाह्य ठरेल. म्हणजे थोडक्यात घटनेची दुर्घटना होईल.” चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्या महाराष्ट्रात आणण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असताना, अंमली पदार्थ संदर्भातली प्रकरणं काढून महाराष्ट्राला बदनाम केलं जात असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. केंद्राकडून निधी वाटपात सापत्न वागणूक दिली असल्याचा आरोप त्यांनी केला. औरंगाबादचं संतपीठ, तसंच मुंबईत उभारण्यात येणाऱ्या सैन्य संग्रहालयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.