मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रिडा मंत्रालय देशभरात ‘क्लीन इंडिया’ मोहिम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत आज मुंबईतल्या गेट वे आँफ इंडिया इथं स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. कोविड निर्बंधांच पालन करत विविध स्वयंसेवी संस्थांच्या ५० स्वयंसेवकांनी गेट वे आँफ इंडिया परिसराची स्वच्छता केली. त्यांनी परिसरातला कचरा जमा करून त्याचं ओला आणि सुका असं वर्गीकरण केलं. तसंच प्लास्टिक कचरा वेगळा केला. या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा आणि पुनर्वापर न होणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश देण्यात आला. या स्वच्छता मोहिमेला युवा व्यवहार विभागाच्या सचिव उषा शर्मा, नेहरु युवा केंद्राचे महासंचालक विजय कुमार, नेहरु युवा केंद्राचे राज्य संचालक प्रकाशकुमार मानुरे उपस्थित होते. स्वच्छतेच्या माध्यमातूनच स्वस्थ आणि निरोगी भारताच उद्दिष्ट गाठता येईल, असं उषा शर्मा यांनी यावेळी सांगितलं.  या स्वच्छता मोहिमेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत असून विविध सामाजिक संघटनांचे, एनसीसीचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, जिल्हा प्रशासनासह मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी या मोहिमेत सहभागी होत आहेत. परिसराची स्वच्छता आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश या माध्यमातून पोहचविण्यात येत असल्याचही शर्मा यांनी यावेळी सांगितलं.