????????????????????????????????????

पुणे : केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीनंतर झालेले परिणाम व लाभार्थ्यांची मते याचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचना भारत सरकारचे केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्या. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभा (दिशा) चे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

बैठकीस महापौर मुक्ता टिळक, खा.गिरीश बापट, खा.सुप्रिया सुळे,पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे तसेच विविध समन्वयन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्हयामध्ये  मुद्रा योजनेमधून 145 मेळाव्यांचे आयोजन करण्यात येवून जवळपास 9 लाख युवकांना याचा लाभ मिळाला आहे याबाबतचा आढावा घेवून जास्तीत जास्त मेळाव्यांचे आयोजन करण्यात यावे व त्यावेळी लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे, या योजनेची जास्तीत जास्त प्रसिध्दी करावी, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबधितांना वेळोवेळी पाठवावा अशा प्रकारच्या सूचना केल्या. रेल्वे विभागामार्फत करण्यात आलेल्या नवीन सोई सुविधांची माहिती घेतली. यावेळी पुणे विभागामध्ये 5 नवीन स्वयंचलीत जिन्यांची  उभारणी करण्यात आली आहे, एकूण 46 स्टेशनवर देण्यात आलेल्या वाय-फायची सुविधा तसेच नव्याने करण्यात येणा-या कामांचा आढावा घेतला.

यावेळी केंद्रीय मंत्री यांनी पासपोर्ट कार्यालये, पोस्ट आणि दूरसंचार विभागांचा आढावा घेवून प्रलंबित कामांबाबत कार्यवाही करण्यात येवून पुढील बैठकीमध्ये माहिती देण्याची सूचना केली. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून  राबविण्यात येणा-या राष्ट्रीय आरोग्य अभियान, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना,आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आरोग्य वर्धीनी केंद्रे, शिक्षण विभागाकडील समग्र शिक्षांतर्गत ग्रंथालये व शालेय साहित्य वाटप इ.चा आढावा घेतला. स्वच्छ भारत मिशन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना इ.योजनांचा आढावा घेवून आवश्यक सूचना केल्या.

केंद्र शासनाच्या वतीने दि.11 सप्टेंबर ते दि.1 ऑक्टोबर या कालावधीमध्ये जनजागृती व श्रमदान मोहिम, दि.2 ऑक्टोबर रोजी गावातील प्लास्टीक कचरा गोळा करणे व ग्रामस्थांचे श्रमदान, दि 3 ते 27 ऑक्टोबर गावातील गोळा झालेले प्लास्टीक कच-याचे व्यवस्थापन करणे इ.बाबींवर चर्चा केली.

या बैठकीपूर्वी  प्रकाश जावडेकर यांनी केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, महाराष्ट्र व गोवा प्रदेश मार्फत केंद्र शासनाच्या योजनांचे फिरते प्रदर्शनाचे तसेच पाणी बचतीचा संदेश देणा-या जलदूत बसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. राज्याच्या 8 जिल्ह्यांमधून या जलदूत बसमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच यावेळी उपस्थितांना पाण्याचे संवर्धन बचत, स्वच्छतेचे पालन  व प्लास्टीक वापर न करण्याबाबत शपथ देण्यात आली.