मुंबई : मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद अशोकचक्र वीर तुकाराम ओंबळे यांच्या गिरगाव येथील स्मारकास अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार सुप्रिया सुळे यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले.

इतिहासातील शूरवीरांच्या गाथा पराक्रम आपण आजवर वाचला आहे. परंतु 26/11 च्या हल्ल्यात निधड्या छातीने दहशतवाद्यांवर चालून गेलेल्या अशोकचक्र वीर शहिद तुकाराम ओंबळे यांचा पराक्रम  मुंबईसह सबंध जगाने पहिला आहे. त्यात शहीद तुकाराम ओंबळे यांनी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्याची किमया केली. अशा या निर्भीड व्यक्तिमत्वाला यावेळी अभिवादन करण्यात आले.

26/11 हा दिवस या देशासाठी काळा दिवस असला तरी समस्त मुंबईकरांना व महाराष्ट्राला निर्धास्तपणे जगण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या शाहिद तुकाराम ओंबळे, वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, मेजर संदीप उनीकृष्णन यांच्यासारख्या शूर अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रति अभिमान, आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे अशा भावना  राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली.