नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रीमंडळातून अजय कुमार मिश्रा यांना हटवावं या मागणीसाठी विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच, द्रमुकचे टी.आर बालू यांनी लखीमपूर खेरी प्रकरणी विशेष तपास पथकाच्या अहवालाचा मुद्दा उपस्थित केला. या अहवालाचा संदर्भ देत, अजय कुमार मिश्रा यांचा मुलगा यात गुंतलेला असल्याचा आरोप त्यांनी केला. मिश्रा यांना मंत्री मंडळातून हटवण्याची मागणी करत काँग्रेस आणि द्रमुकचे सदस्य हौद्यात उतरुन घोषणाबाजी करु लागले. हा मुद्दा प्रश्नोत्तरांच्या तासांनंतर उपस्थित करावा आणि सभागृहाचं काम चालू द्यावं, असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी या सदस्यांना केलं. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. कोविड धोका अद्याप संपलेला नसल्यानं या सदस्यांनी मुखपट्टी लावावी, असं आवाहन संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं. गोंधळ वाढत गेल्यानं कामकाज आधी दुपारी दोन वाजेपर्यंत, तर नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.