मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषा अतिशय समृद्ध असून मराठी वृत्तपत्रांमधले अभ्यासपूर्ण आणि अभिरुचीसंपन्न लेख तसंच इतर समृद्ध साहित्य, हिंदी भाषिकांसाठी उपलब्ध करण्यासाठी राज्यातल्या पत्रकार आणि साहित्यिकांसह मुंबई हिंदी सभेनं पुढाकार घ्यावा, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केलं. मुंबई हिंदी सभेच्या अमृत महोत्सवाचं उद्घाटन राज्यपालांच्या उपस्थितीत आज राजभवन इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते. महात्मा गांधी यांनी देशाला जोडण्यासाठी हिंदुस्तानी भाषेचा पुरस्कार केला असं सांगताना हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारात बिगर हिंदी भाषिकांचं योगदान कितीतरी पटीनं मोठं असल्याचं राज्यपाल म्हणाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते हिंदी भाषा प्रचार-प्रसाराकरिता कार्यरत नामवंतांचा सत्कार करण्यात आला.