नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनतेची आणि देशाची स्वप्न ही वेगळी नसून देशाच्या प्रगतीमध्येच आपली प्रगती अंतर्भूत आहे, आणि ही भावनाच नवभारताची सर्वात मोठी शक्ती बनत आहे,असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या “आझादी का अमृतमहोत्वव से स्वर्णीम भारत की ओर” या उपक्रमाच्या उदघाटन सोहळ्यात ते आज दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते. देशाच्या सर्वांगीण विकासाकरता सर्वांचं सहकार्य आणि प्रयत्न आवश्यक असून सामाजिक न्याय आणि समानतेच्या तत्वांवर उभी असलेली भेदभावविरहित समाज व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे  असं प्रधानमंत्री म्हणाले. देश प्रगतीच्या मार्गावर नेणारे नवीन निर्णय घेत असून त्याद्वारे नवभारताच्या युगाचा साक्षीदार ठरत आहे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील देश आपल्या मूल्यांशी तडजोड करत नाही, हेच आपल्या देशाचं बलस्थान आहे असं त्यांनी सांगितलं. समाजासाठी विविध कामं करणारी प्रजापती ब्रह्मकुमारी संस्था आत्मनिर्भर भारतासाठी निश्चितच हातभार लावू शकते, असे गौरवोद्गार प्रधानमंत्र्यांनी यावेळी काढले.