नवी दिल्‍ली : महाराष्‍ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज याची घोषणा केली आहे. या घोषणेबरोबरच तिन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली असून महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान होऊन 24 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातल्या विविध राजकीय पक्षांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. 9 नोव्हेंबर 2019 रोजी विद्यमान विधानसभेची मुदत संपणार आहे, त्यामुळे त्याआधी निवडणुका होणं आवश्यक आहेत.

महाराष्ट्रात 288 जागा तर हरियाणात 90 जागांसाठी मतदान होईल. महाराष्ट्रात 8.94 कोटी मतदार असून हरियाणात 1 कोटी 84 लाख मतदार आहेत. तर महाराष्ट्र विधानसभा आणि हरियाणा विधानसभांचा कार्यकाळ अनुक्रमे 9 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबर रोजी संपत असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि हरियाणात एकाच टप्प्यात मतदान

– नामनिर्देशन अर्जांची सुरुवात – 27 सप्टेंबर
– अर्ज भरण्याची अंतिम मुदत – 4 ऑक्टोबर
– अर्जांची छाननी – 5 ऑक्टोबर
– अर्ज परत घेण्याची अंतिम मुदत – 7 ऑकटोबर
– मतदान – 21ऑक्टोबर
– निकाल – 24 ऑक्टोबर

काय म्हणाले आयुक्त?‌

> एकही कॉलम रिकामा राहिल्यास उमेदवारी अर्ज रद्द होईल.
> उमेदवारांना 28 लाख रुपये खर्चाची मर्यादा.
>निवडणुकांसाठी 1.8 लाख ईव्हीएमचा वापर
>महाराष्ट्रात दोन पर्यवेक्षक पाठवले जाणार.
>2 नोव्हेंबरआधी मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल.
>निवडणुकीसाठी खास सुरक्षा व्यवस्था तैनात करणार.
>निवडणूक खर्चाची निगराणी पर्यवेक्षक करतील.
>यंदा प्लास्टिकमुक्त निवडणुकीचा संकल्प.
>सर्व उमेदवारांनी शस्त्रास्त्रे जमा करणे बंधनकारक.
>उमेदवारांना गुन्ह्यांची माहिती देणंही बंधनकारक असेल.
>पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी खास पथके.
>गडचिरोली, गोंदियासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था असेल.
>महाराष्ट्रातील चेकपोस्ट आयोगाच्या नजरेखाली असतील.
>उमेदवारांना 30 दिवसांचा हिशेब द्यावा लागेल.
>ईव्हीएम, व्हीव्हीपॅट डबल लॉकमध्ये ठेवणार.
>विविध राज्यांत एकूण विधानसभेच्या 64 पोटनिवडणुका होणार आहेत.

2014 च्या निवडणुकांमध्ये एकूण 4,119 उमेदवार उभे होते. त्यावेळी सर्वच पक्षांनी निवडणुका वेगवेगळ्या लढवल्या होत्या. भाजपचे 260 उमेदवार, शिवसेनेचे 282 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे 287 आणि काँग्रेसचे 278 उमेदवार उभे होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 220 उमेदवार उभे केले होते. बहुजन विकास आघाडीचे 36, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (MIM) चे राज्यभरात 24, तर भारिप बहुजन महासंघाचे 70 उमेदवार रिंगणात होते.

एकूण मतदारसंघ = 288
अनुसूचित जातींसाठी राखीव – 29
अनुसूचित जमातींसाठी राखीव – 25