नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्नशील असून सेंद्रिय शेती सारख्या सर्वच दृष्टीनं फायदेशीर ठरणाऱ्या प्रयोगांना प्रोत्साहन दिलं जात आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत आर्थिक मदतीचा आठवा हप्ता आज पंतप्रधानांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. दूर दृश्य प्रणाली द्वारे झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर हेही उपस्थित होते. या कार्यक्रमात सुमारे १९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी, साडे नऊ कोटीहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात हस्तातंरित करण्यात आला. कोरोना संकटाच्या काळातही देशातल्या बळीराजानं अन्न धान्याचे आणि फळ पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. तसंच केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून विक्रमी धान्य खरेदी केली आहे; असे पंतप्रधान यावेळी म्हाणाले.

देश सध्या कोरोनाच्या प्रचंड आव्हानाला तोंड देत आहे; एका अदृश्य शत्रू विरोधात आपलं युद्ध  सुरू आहे; सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच आपण या संकटातून बाहेर पडू असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. कोरोना संबंधीच्या नियमांचं काटेकोर पालन आणि लसीकरण हाच कोरोनाला रोखण्याचा मार्ग आहे; याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. त्याच बरोबर या कठीण प्रसंगातही आवश्यक साधन सामग्रीचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला.  यावेळी पंतप्रधानांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी संवादही साधला. ”पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने”अंतर्गत शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६ हजार रुपये याप्रमाणे; प्रत्येकी २००० रुपयांचे तीन हप्ते थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत १ लाख १५ हजार कोटी रुपयांचा निधी शेतकरी कुटुंबांना वितरीत करण्यात आला आहे.