नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-युके करारामुळे नौवहन क्षेत्रात खलाशांना जागतिक संधी उपलब्ध होतील, याचा महाराष्ट्रातल्या खलाशांनाही लाभ मिळेल, असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनं केंद्रीय अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या ‘उद्योगक्षेत्राशी संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्र सरकारनं २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी मांडलेला अर्थसंकल्प देशाच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि नवभारताकडे नेणारा अर्थसंकल्प आहे असं ते म्हणाले. केंद्रीय अर्थसंकल्पात साडे दहा लाख कोटी रुपये भांडवली खर्चाची तरतुद असल्यानं, पायाभूत सुविधांच्या निर्मितीत वाढ होईल आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, याशिवाय खासगी क्षेत्राकडूनही भांडवली गुंतवणूकीला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ४०० बिलियन डॉलर निर्यातीचं उद्दिष्ट समोर ठेवलं होतं, त्यापैकी आतापर्यंत दहा महिन्यांमध्ये ३३६ बिलीयन डॉलर्स निर्यात साध्य करण्यात यश मिळालं असल्याचंही त्यांनी नमूद केलं.