मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ आज मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात चौपदरीकरणाचं काम सुरू असताना दरड कोसळली. त्यामुळे दोन पोकलेन यंत्रं दरीत कोसळली असून एका चालकाचा मृत्यू झाला. आज सकाळी पावणेअकरा वाजता ही दुर्घटना झाली. दरडीखाली दोन पोकलेन आणि त्यांचे चालक अडकले आहेत. घाटात चौपदरीकरणासाठी डोंगर कापण्याचं काम सुरू आहे. रस्त्याच्या वरच्या बाजूला पोकलेननं खोदकाम करत असतानाच बाजूचा डोंगराचा भाग खाली आला. या घटनेमुळे घाटात दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.