नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडमधल्या क्वीन्सटाऊनमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडनं या संघाला ३ गड्यांनी पराभूत केलं. नाणेफेक जिंकून भारतानं फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय महिला क्रिकेटपटूंनी न्यूझीलंडसमोर २७१ धावांचं लक्ष्य ठेवलं. मिताली राजनं ८१ चेंडूत ६६ तर रिचा घोषनं ६४ चेंडूत ६५ धावा केल्या. न्यूझीलंडनं हे लक्ष्य केवळ ४९ षटकात साध्य केलं. अमेलिया केर हिनं १३५ चेंडूत ११९ धावा केल्या. यामुळं ५ सामन्यांच्या मालिकेतले २ सामने जिंकून न्यूझीलंड आघाडीवर आहे. तिसरा सामना शुक्रवारी होणार आहे.