मुंबई (वृत्तसंस्था) : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात भाविकांना आता थेट प्रवेश मिळणार आहे. लोकभावनेचा आदर करत दर्शनासाठी आवश्यक असणारा ई-पास स्थगित करण्याचा निर्णय देवस्थान व्यवस्थापन समितीनं शनिवारी घेतला असून त्यानंतर लगेचच अंबाबाई मंदिराचं महाद्वार उघडण्यात आलं. काल दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई आणि जोतिबा मंदिर पूर्णपणे बंद होतं. मंदिरं खुली झाल्यानंतर ऑक्टोबर 2021 पासून दर्शनासाठी ई-पास सक्तीचा करण्यात आला होता. चैत्र महिन्यात होणारा अंबाबाईचा रथोत्सव सलग दोन वर्षे भाविकांशिवाय झाला. यावर्षी मात्र तो भाविकांच्या उपस्थितीत आणि पूर्ण जल्लोषात होणार आहे. त्याचप्रमाणे जोतिबाची यात्राही भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे, असं देवस्थान समितीकडून सांगण्यात आलं.