मुंबई : ‘पर्यटन आणि त्यातून रोजगार निर्मिती’ ही यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे. राज्यात पर्यटनातून रोजगार निर्मितीला वाव असल्याचे मंत्रालयात झालेल्या जागतिक पर्यटन दिन कार्यक्रमात सांगण्यात आले.

यावेळी पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर, ‘एमटीडीसी’चे महाव्यवस्थापक रवींद्र राजपूत, पर्यटन विभागाचे अवर सचिव रमेश कदम, ठाण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील पर्यटन पदविका शाखेचे प्राचार्य अरविंद महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

‘पर्यटन व प्रवास व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करताना अरविंद महाजन म्हणाले की, युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायजेशनची स्थापना २७ सप्टेंबर १९७० रोजी झाली. त्यानंतर १९८० पासून २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. पर्यटन क्षेत्रात दर्जेदार शैक्षणिक अभ्यासक्रम तयार होत आहेत. पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. पर्यटन हे असे क्षेत्र आहे जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रोजगाराची संधी उपलब्ध करते. क्रुझ टुरिझम, हेरीडेज टुरिझम, ॲग्रो टुरिझम यांना खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर म्हणाले की, महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक व भौगोलिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे पर्यटकांची राज्याला प्रथम पसंती असते. राज्यात पर्यटक सर्व प्रकारच्या पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात. राज्यात जंगले, वन्यजीव, समुद्रकिनारे, गडकिल्ले, पुरातन गुफा, वास्तू, तिर्थक्षेत्रे, थंड हवेची ठिकाणे तर आहेतच, पण त्याचबरोबर बॉलिवूड टुरिझम, मुंबईसारख्या महानगरांमधील टुरिझम, क्रुझ टुरिझम, ॲग्रो टुरिझम, हेरीटेज टुरिझम, एक्सपीरीएन्शिअल टुरिझम अशा विविध पर्यटन क्षेत्रास वाव आहे, असे त्यांनी सांगितले.