नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 17 कोटी 90 लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड प्रदान केले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी काल राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. जगातला सर्वात मोठा आरोग्य सेवा कार्यक्रम असलेली ही योजना असुरक्षित कुटुंबांना वार्षिक पाच लाख रुपयांचे आरोग्य कवच प्रदान करते आणि देशभरातील दहा कोटी गरीब कुटुंबांना लाभ मिळवून देण्याचं तिचं उद्दिष्ट आहे.

या योजनेंतर्गत 3 कोटी 28 लाखांहून अधिक लोकांनी उपचार घेतले आहेत. पवार म्हणाल्या की, ओडिशा आणि दिल्ली या योजनेत सामील झाले नाहीत, तर पश्चिम बंगालने जानेवारी 2019 मध्ये या योजनेतून माघार घेतली. या योजनेमुळं देशातील खिशातून होणारा वैयक्तिक खर्च कमी करण्यात यशस्वीपणे योगदान दिलं असल्याचं मंत्री म्हणाल्या.