नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद म्हणजे मानवी अधिकाराचे सर्वात मोठ्या प्रमाणावरचं उल्लंघन असून त्याचा बिमोड करणे म्हणजे मानवाधिकाराचे रक्षण करणे आहे असं मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे. ते १३ व्या राष्ट्रीय तपास यंत्रणा दिवसानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी पूर्ण निर्धारानं दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी काम करायला हवं असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं दहशतवादाच्या विरोधात शुन्य दुर्लक्ष धोरण अवलंबलं असून दहशतवादाचा समुळ नाश करण्यासाठी काम केलं जात आहे असंही ते म्हणाले. केंद्र सरकारनं दहशतवादाच्या विरोधातले कायदे आणि संस्था अधिक कडक केलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय तपास यंत्रणांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी सरकार तयार आहे अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.