नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ म्हणजेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम जवळपास पूर्ण झालंय.

अर्थात त्यामुळे वाहतूक जलद आणि सुरक्षित होतेय. एकूण साडेचारशे किलोमीटरचा हा राष्ट्रीय महामार्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यापैकी ९० किलोमीटर्सचा भाग आहे. तळगाव ते कलमठ आणि कलमठ ते झाराप तिठा हे दोन टप्पे आहेत. यासाठी सुमारे २ हजार २४२ कोटी ८३ लाख खर्च आलाय. २०१७ मध्ये २३ जूनला हा कामाचं भूमिपूजन झालं होत. जिल्ह्यात चौपदरीकरणाचं काम पूर्ण झालं असलं तरी अजून दोन ठिकणी जमीन मोबदल्याचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे त्या ठिकाणी एका मार्गिकेवरून सध्या वाहतूक सुरु आहे.

मुंबई गोवा महामार्गाच चौपदरीकरण झालं असलं तरी काही ठिकाणी मजबुतीकरण, डांबरीकरण, सर्व्हिसरोड बांधकाम चुकीचं झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे गेल्या पावसात महामार्गावर पाणी साठून महामार्ग ठप्प होण्याचे प्रकार घडले होते. कुडाळमध्ये पूल बांधताना त्या ठिकाणी मातीचा मोठा बांध घालून पुलाची उंची वाढवल्यामुळे पुराचं पाणी एकाबाजूला साठून काही ग्रामस्थांना पुराचा फटका देखील बसला होता.

बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या समपातळीचा देखील प्रश्न आहे. पण एकंदरीत चौपदरीकरणामुळे महामार्गावरून वाहतूक जलद गतीने होत असल्यानं लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे.