मुंबई (वृत्तसंस्था) : बीआयएस अर्थात भारतीय मानके संस्थेने ठाण्यातील भिवंडी इथून पिण्याच्या पाण्याच्या ४ हजार ९०० सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत. या बाटल्यांवर बीआयएसच्या मानक चिह्नाचा बेकायदेशीर वापर केला होता. बीआयएसच्या मुंबई पथकाने, भिवंडीत काल टाकलेल्या धाडीत ही बाब उघडकीस आली.

मेसर्स बालाजी एन्टरप्रायझेस या कंपनीने बीआयएसकडून वैध परवाना न घेताच बीआयएस प्रमाणन चिह्नाचा बेकायदेशीर वापर केल्याचं निष्पन्न झालं आहे. या अपराधाबद्दल न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. मोठ्या प्रमाणात नफा कमावण्यासाठी अनेकदा आयएसआयच्या बनावट चिन्हाचा  वापर करून उत्पादननं तयार केली जातात आणि ग्राहकांना विकली जातात. म्हणूनच ग्राहकांनी खरेदीपूर्वी त्या वस्तूवरच्या  आयएसआय चिन्हाची  सत्यता पडताळून पाहावी आणि त्यासंबंधी लगेच माहिती कळवावी असं आवाहन भारतीय मानके संस्थेनं केलं आहे.