मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रकार म्हणजे सरकार आणि नागरीक यांच्यातला दुवा असून सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार करु शकतात, देश  विकसित बनण्यात  पत्रकारांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असं केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे. भागवत कराड यांच्या हस्ते आज औरंगाबादमध्ये “वार्तालाप” या एकदिवसीय माध्यम कार्यशाळेचं आणि केंद्रीय संचार ब्युरोनं आयोजित केलेल्या “आठ वर्षे – सेवा, सुशासन, गरीब कल्याण” या विषयावरच्या  छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.

सरकार आर्थिक समावेशनाच्या दृष्टीनं, बँकींग सुविधा नसलेल्यांसाठी बँकींग सुविधा, निधी नसलेल्यांसाठी निधी पुरवठा, असुरक्षित घटकांना संरक्षण प्रदान करणं या तीन आधारस्तंभावर कार्य करत आहे, असं  डॉ. कराड यांनी यावेळी सांगितलं. मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाच्या वतीनं आयोजित या परिषदेत महाराष्ट्र आणि गोव्याच्या पत्र सूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनुष्यबळ आयुक्त नितीन पाटील, पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी-स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.