नवी दिल्ली : आंतरमंत्रीगटाच्या समितीनं नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत देशातल्या कांदे, टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा घेतला. तसंच त्यांचा पुरवठा वाढवण्यासंबंधीच्या उपाय योजनांवर चर्चा केली.

अनेक राज्यांमधे आता टोमॅटोचे भाव नेहमीप्रमाणे सामान्य झाले आहेत, तसंच मध्य प्रदेशातूनही टोमॅटोची आवक होत आहे. त्यामुळे दर आणखी कमी होतील, असं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने या बैठकीत सांगितलं.

मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून कांद्याचा नवा साठा लवकरच उपलब्ध होणार असल्यानं दिवाळीच्या कालखंडात कांद्याचे भावही कमी होण्याची शक्यता आहे. देशात डाळींचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे केंद्रीय भंडार आणि सफलच्या माध्यमातून देशभरात डाळींचं वितरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.