मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ते आज शिर्डी इथं पक्षाच्या चिंतन शिबिरात बोलत होते. ही मागणी मान्य झाली नाही तर सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यात येणारे प्रकल्प इतर राज्यांकडे जात असल्याचं सांगत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. या शिबिरात पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. आगामी निवडणुकांमध्ये विजयी होण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेसह अनेक उपक्रमांबाबत त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केले.