मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योगांसाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधाही निर्माण केल्या जात असल्यानं राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक सातत्यानं वाढत आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल सांगितलं. मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं  ICAI द्वारे आयोजित २१ व्या जागतिक ‘सीए’, अर्थात सनदी लेखापाल काँग्रेसचा समारोप काल झाला. या कर्यक्रमात फडनवीस बोलत होते.

देशात आणि राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक येण्यासाठी सध्या अतिशय पोषक वातावरण असून राज्यात इलेक्ट्रॉनिक वाहनं, सौर ऊर्जा, तसंच पर्यायी ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात वाढ होत आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये गुंतवणूक वाढीसाठी ‘सीए’ समुदाय मोठा वाटा उचलू शकतो, असं ते म्हणाले. यावेळी जागतिक लेखापाल काँग्रेसच्या अध्यक्ष अस्मा रस्मौकी, ICAI चे अध्यक्ष देवाशीष मित्रा, सचिव जयकुमार बत्रा, उपाध्यक्ष अनिकेत तलाटी व पदाधिकारी उपस्थित होते.

अर्थव्यवस्थेमध्ये सनदी लेखापालांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. सीए केवळ उद्योगांना चालना देण्यासाठी आणि व्यवसाय चालवण्यासाठीच नव्हे तर देशात गुंतवणूक आकर्षित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्योजकता वाढीसाठी मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टॅंड अप इंडिया, युनिकॉर्न असे अनेक उपक्रम आणले. अर्थव्यवस्थेला उद्योग क्षेत्राच्या विकासामुळे गती मिळत असते. महाराष्ट्र राज्य आता नाविन्यतेची, स्टार्ट अप्स आणि युनिकाॅर्नची राजधानी बनत आहे. २५ टक्क्यांहून अधिक स्टार्ट अप्स आणि युनिकॉर्न राज्यातले आहेत. या सर्वांच्या योग्य अंमलबजावणीसाठीही सीएंना महत्त्वाची भूमिका बजावता येईल असं फडनवीस यांनी सांगितलं.

महाराष्ट्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे. देशात जीएसटी संकलनात राज्याचा वाटा सर्वात मोठा आहे. राज्यातल्या जीएसटी करसंकलनात वाढ झाली आहे. तसंच करदात्यांच्या तक्रारींचं निराकरणही त्वरित केलं जात आहे. शासनानं रस्ते, मेट्रो आणि दळणवळणांच्या इतर माध्यमांना बळकट करण्यात विशेष लक्ष दिले आहे. वेगानं विकास करताना महाराष्ट्रात पोषक औद्योगिक वातावरण निर्माण केलं असल्याचं ते म्हणाले.