मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या  २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांचं देश कृतज्ञतेनं स्मरण करत आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. आपलं कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सुरक्षा रक्षकांना देश आदरांजली वाहत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीही २६/११ च्या हल्ल्यात जीव गमावलेल्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाला २६/११ च्या हल्ल्याचं विस्मरण झालेलं नाही, आणि ते कधीही विस्मृतीत जाणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात  शहीद झालेले पोलीस, सुरक्षा दलाचे  अधिकारी आणि नागरिकांना माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आदरांजली वाहिली आहे. राष्ट्र नेहमीच या शूरवीरांच्या त्याग आणि बलिदानाचं  स्मरण करेल, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.