नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या १ डिसेंबर रोजी भारत जी-२० समूहाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहे. या निमित्तानं गेल्या शनिवारी अंदमान निकोबार द्वीप समूहांमधील स्वराज द्वीपावर जी-२० च्या सदस्य देशांचे अभियान प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सदस्यांसाठी एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

जी-२०चे शेर्पा अमिताभ कांत आणि मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रींगाला यांच्यासह ४० पेक्षा जास्त प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी उपस्थित सदस्य देशांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींसाठी विशेष माहिती सत्र आयोजित करण्यात आलं होतं. भारताच्या अध्यक्षतेखालची जी-२० परिषद सर्वसमावेशक, महत्वाकांक्षी, निर्णायक आणि कार्याभिमुख असेल, या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा बाली इथं नुकत्याच झालेल्या जी-२० संमेलनात अमिताभ कांत यांनी पुनरुच्चार केला होता.