मुंबई (वृत्तसंस्था) : देशात खनीकर्म व्यवसायाला चालना देण्याचं काम सुरू असून कोळशाच्या बाबतीत आत्मनिर्भर होतानाच पर्यावरण रक्षणासाठी आपला देश वाटचाल करत असल्याचं केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत कोळसा आणि खनिकर्म गुंतवणूकदारांच्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. कोळसा खाणींच्या मंजुरी प्रक्रियेत सुलभता आणली जात आहे. त्याचबरोबर सिंगल विंडो व्यवस्था देखील निर्माण केली असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात सध्या १३ कोळसा खाणींचा लिलाव करत असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात खनिकर्म व्यवसायाला मोठी संधी असून लोह आणि बॉक्साईटसह अन्य धातूंच्या खाणींचं प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे राज्याच्या महसुल वाढीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, असंही जोशी यांनी सांगितलं.