नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या संविधानामध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी समान नागरी कायदा आणण्यासंबंधी लिहिलं गेलं आहे. घरात ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तिसोबत समान व्यवहार केला जातो त्याप्रमाणे देशातल्या प्रत्येक नागरीकासाठी सुद्धा एकच कायदा असायला हवा, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते काल भोपाळमधल्या मोतीलाल नेहरू मैदानावर झालेल्या भाजपाच्या “मेरा बूथ सबसे मजबूत” या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. विरोधी पक्ष समान नागरी कायद्याच्या नावावर जनतेला भडकवत आहेत,तसच मतांसाठी राजकारण करत आहेत असा आरोप विरोधी पक्षावर मोदी यांनी यावेळी बोलताना केला. ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या अभियानाच्या अंतर्गत मोदी यांनी काल देशातल्या ५४३ लोकसभा मतदारसंघातल्या जवळपास १०० लाख कार्यकर्ते आणि मध्य प्रदेशातल्या ६४ हजार १०० बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला.