सत्तेचा समन्वय, कालबद्ध मागोवा, अखंड दौरे आणि अथक मेहनत या चतु:सूत्रीने भाजपाला विधानसभेत सलग दुसऱ्यांदा सत्तास्थानी आणून ठेवले. पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात नागपुरी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर यश मिळाले. संघवर्तुळाचे चेहरे त्यामुळे उजळले नसते तर नवल. तथापि, विदर्भातील एकूण ६२ जागांवर छाप टाकण्यात भाजपला यश आले नाही. ‘अस्तित्वच नाही’, असे म्हणून थट्टेचा विषय बनलेल्या विरोधी पक्षाने भाजपच्या गडाला यंदा चांगलेच धक्के दिले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अनुभवाचा दबदबा या प्रचारात विदर्भाने बघितला. विकासापेक्षाही जातीय समीकरणे मोठी ठरण्याचे दुर्दैवी वास्तव विदर्भातही झळकलेच.

विदर्भात ना मोदी लाट चालली, ना कर्जमाफी. मतदार समृद्धी महामार्गाला भाळले नाहीत. ‘कलम ३७०’ ची भुरळही त्यांना पडली नाही. वेगळ्या विदर्भाचेही मतदारांनी सोयीस्कर विस्मरण केले. लोकसभा निवडणुकीत दहापैकी नऊ जागांवर विजयी पताका फडकवण्याऱ्या भाजपच्या यावेळी १५-१६ जागा कमी झाल्या. ‘शत प्रतिशत’ चा नारा नाकारण्याचे काम विदर्भात झाले. आमगावपासून खामगावपर्यंतचे बडे नेते भाजपच्या रडावर असल्याचे चित्र रंगविण्यात आले. हा ‘सायकॉलॉजिक गेम’ विरोधकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारा ठरला. उत्तर प्रदेश, बिहारसारखी स्थिती होते की काय, असे वाटत असतानाच सुमारे १५ जागांवर विजय मिळाल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य आले. जागा निश्चित करताना अनेक नेते व गटांना त्यांच्या क्षेत्रात व्यस्त करून काँग्रेसने थोडेफार ‘डॅमेज कंट्रोल’ केले. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आलेले मुकुल वासनिक यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी होती. त्यांनी बऱ्यापैकी प्रयत्न केले तरी, दोन-चार सभांचा अपवाद वगळता कार्यकर्त्यांसाठी ते ना ‘व्हिजिबल’ होते ना ‘रिचेबल’’. रुसवे-फुसवे विसरून एकसंधतेने काम केले असते, तर भाजपच्या जागा निम्मयाहून कमी झाल्या असत्या, ही काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना निकालानंतर बोलकी झाली. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या आवाहनात फक्त विकास ठाकरेंचा उल्लेख असणे यातूनच काँग्रेसला व्याप्ती वाढविण्याची गरज स्पष्ट झाली.

नवरात्र आटोपताच शरद पवार यांनी विदर्भाचा दौरा केला. स्थिती ओळखून कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात त्यांच्या भेटींचा उत्तम उपयोग झाला. प्रचार भरात असताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर आल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. तरीही विदर्भात राष्ट्रवादीने सहा जागांपर्यंत धडक मारली, हे महत्त्वाचे. बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीने आलेली संधी गमावली. पंतप्रधानांची सभा झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांचे मित्र परिणय फुके यांना हरवून नाना पटोले विधानसभेत आले आहेत. त्याच्या सोबतीला विजय वडेट्टीवारही आहेत. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, माजी मंत्री राजकुमार बडोले, चैनसुख संचेती, सुधाकर देशमुख, अंबरीश आत्राम यांच्यासारख्या नेत्यांच्या पराभवाने भाजपाच्या विजयाचा आनंद कमी केला. पक्षश्रेष्ठींच्या खफामर्जीमुळे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विकेट पडली होती. पूर्व विदर्भाच्या ‘मोठ्या’ जबाबदारीचे डावपेच नेत्यांनी आखले, मात्र ऐनवेळच्या ‘टेकू’मुळे प्रतिष्ठा सावरता येत नाही याची जाणीव पक्ष कार्यकर्त्यांना झाली. सुधीर मुनगंटीवारांच्या चंद्रपूर परिसराने पक्षाला चिंतातुर केले. नितीन गडकरींना पक्षात दुय्यम भूमिका दिली जात असल्याची सल मतमोजणीचा कल येताच झपाट्याने समृद्ध होत गेली. हा संशय विश्वासात बदलणार नाही याची काळजी भाजपश्रेष्ठींना भविष्यात घ्यावी लागेल.