मुंबई : राज्यातल्या निवृत्त शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना विहित वेळेत निवृत्तीवेतनाचे पैसे मिळावेत यासाठी पुढच्या अधिवेशनापर्यंत कार्यप्रणाली निश्चित करून अंमलात आणली जाईल,असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. हे निवृत्तीवेतन दर महिन्याच्या एक तारखेला बँक खात्यात जमा होणं आवश्यक आहे.

मात्र अनेकदा २० ते २५ तारखेनंतर निवृत्तीवेतन जमा होत असल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेंद्र दराडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत निवृत्तीवेतन मिळावं यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.

शेतकऱ्यांना बी-बियाणे पुरवणाऱ्या महाबीज या राज्य सरकारच्या कंपनीचं बळकटीकरण करण्यासाठी व्यवस्थापनात बदल केला जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत केली. याबाबत सचिन अहिर तसंच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. बोगस बी-बियाणं, खतं आणि औषधाच्या विरोधात कडक शिक्षेची तरतूद करणारा कायदा या अधिवेशनातच संमत केला जाईल, असंही कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केलं.