नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात घोंघावत असलेलं अतितीव्र ”महा” चक्रीवादळ वायव्य दिशेकडे सरकलं असून गुरुवार पहाटेपर्यंत  दीव आणि पोरबंदर दरम्यान गुजरात किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. यावेळी  वाऱ्यांचा वेग तशी ८० ते १०० किलोमीटर राहील, आणि काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

या वादळाचा कमीत कमी फटका बसावा या दृष्टीनं गुजरात सरकारनं व्यापक व्यवस्था केली आहे. गुजरात किनापरपट्टी ओलांडताना या चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. गुजरातचे, मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी गांधीनगर इथं उच्चस्तरीय बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. समुद्रात असलेल्या मासेमारी नौका सुखरूप परत आल्या आहेत.

मदतकार्यासाठी तटरक्षक दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १५ तुकड्या आणि नौदलाच्या पश्चिम कमांडची ४ जहाजं सज्ज आहेत, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पंकज कुमार यांनी ही माहिती दिली.